*गोसेवेने जपला जातो अहिंसा–करुणेचा वारसा ना. भरत पाटील यांचे गौरवोद्गार**
कराड | विद्या मोरे
श्री भगवान महावीर यांनी मानवजातीसमोर ठेवलेला अहिंसा, करुणा आणि सर्व प्राणीमात्रांवरील दयाभावाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असून, या शिकवणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे कार्य श्री भगवान महावीर गोपालन सेवा संस्था करीत आहे. गोसेवेच्या माध्यमातून जपला जाणारा हा अहिंसा–करुणेचा वारसा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक ना. भरत पाटील (नाना) यांनी काढले.
कराड येथे संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या गोशाळेस त्यांनी सदिच्छा भेट देऊन गोधनाची पाहणी केली. गोसेवकांशी संवाद साधताना आणि गोवंशाच्या आरोग्याविषयी माहिती घेताना ते बोलत होते. “अहिंसा ही केवळ तत्त्वज्ञान म्हणून ठेवण्यापेक्षा ती आचरणात आणणे गरजेचे आहे; आणि महावीर गोपालन सेवा संस्था हे कार्य मनापासून पार पाडत आहे,” असे ते म्हणाले.
सध्या या गोशाळेत दीडशेहून अधिक गोवंश व काही इतर पशूंचे संगोपन, संवर्धन आणि उपचार केले जातात. जखमी, आजारी किंवा अनाथ अवस्थेत सापडणाऱ्या पशूंना येथे सुरक्षित निवारा दिला जातो. आहार, वैद्यकीय उपचार, स्वच्छता आणि संरक्षण या सर्व बाबींची काटेकोर काळजी घेतली जाते, ही बाब विशेषत्वाने उल्लेखनीय असल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले.
प्राणीमात्रांची सेवा म्हणजेच खरी समाजसेवा
भगवान महावीरांच्या शिकवणीनुसार प्राणीमात्रांप्रती करुणा ठेवणे हे प्रत्येकाचे मानवी कर्तव्य असल्याचे सांगून ना. पाटील म्हणाले की, गोसेवा म्हणजे केवळ धार्मिक कृती नसून सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. समाजात शांतता, सौहार्द आणि संवेदनशीलता वाढविण्यासाठी अशा कार्यांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, या सेवाकार्यात वेळ, श्रम आणि आर्थिक साहाय्य अर्पण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांनी विशेष गौरव केला. भविष्यात गोसेवेचे कार्य अधिक व्यापक व्हावे, गरजू व आजारी पशूंना अधिक प्रमाणात मदत मिळावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी नगरसेवक सौरव पाटील (तात्या), खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक जवाहर पवार, अॅड. महादेव साळुंखे, आशिष ओसवाल, भरत ओसवाल, जितेंद्र ओसवाल, विनोद ओसवाल, केतन कटारिया, रुपेश पवार यांच्यासह अनेक गोसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोशाळेच्या पुढील विकास आराखड्यावरही चर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment