कृष्णा पुलावर जाळी बसवण्या संदर्भात मनोज माळी यांच्या आमरण उपोषणाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा
कराड:विद्या मोरे
कराड तालुक्यातील कोयना पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी मनोज माळी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ (बापू), जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे पाटील, कराड दक्षिण अध्यक्ष युवराज कुराडे पाटील, कराड शहराध्यक्ष संदीप काळे, कराड दक्षिण उपाध्यक्ष विनोद पाटील तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तोहीद पटेल, सौ विद्या मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोयना पुलावर कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी किंवा समुपदेशन केंद्र नसल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. अनेक तरुण, शेतकरी व नागरिक नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत असून, त्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळत आहे.
याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन कोयना पुलावर संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात, आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, तसेच मानसिक आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मनोज माळी यांच्या आमरण उपोषणामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Comments
Post a Comment