कराड दौऱ्यात उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार यांचा ठाम संदेश; परंपरेतून नेतृत्वाकडे
कराड : विद्या मोरे :
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनित्राताई अजितदादा पवार यांनी आज कराडचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत सुनित्राताई पवार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या थोर नेतृत्वाच्या विचारांना व मूल्यांना कृतज्ञतेने नमन केले. या वेळी काही काळ मौन पाळत त्यांनी आदरांजली वाहिली. वैयक्तिक दुःखाच्या पार्श्वभूमीवरही राज्यसेवेची जबाबदारी स्वीकारून आदर्श नेतृत्वापुढे नतमस्तक होण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी भावूक ठरला.
राजकीय आरोप-प्रत्यारोप, नियुक्तीवरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. पदग्रहणानंतर थेट आदर्श नेतृत्वाला नमन करून पुढील वाटचाल सुरू करणे म्हणजे सत्तेपेक्षा जबाबदारी मोठी आहे, असा ठाम आणि सूचक संदेश या कृतीतून देण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कराड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. विकासकामांना गती देणे, प्रशासन अधिक संवेदनशील आणि गतिमान ठेवणे, तसेच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
हा दौरा केवळ औपचारिक नव्हता, तर विरोधकांच्या अटकळींना आणि टीकेला शब्दांत नव्हे तर कृतीतून उत्तर देणारा ठरला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मूल्यांवर चालत महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि धैर्याने काम करण्याचा निर्धार या दौऱ्यातून स्पष्टपणे दिसून आला.
या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment