कराड शहर पावसाळ्या साठी सज्ज; पुरनियोजन, नाले सफाई आणि पाणीपुरवठ्या बाबत नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची दिलासा दायक ग्वाही ; कृष्णा नदीतील सध्याच्या प्रदूषणाचा शहराच्या पिण्याच्या पाण्याशी संबंध नाही ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
कराड : विद्या मोरे
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिकेने सर्वंकष नियोजन केले असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. शहरात पावसाचे पाणी वेगाने व सुरळीत वाहून जावे, कोणत्याही भागात पाणी साचू नये आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागू नये, त्यासाठी स्वतः पाहणी ठीक ठिकाणी केली व या साठी सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
नाले, गटारे आणि ओढ्यांची व्यापक स्वच्छता
शहरातील प्रमुख नाले, गटारे आणि ओढ्यांची युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम राहावा, पावसाचे पाणी तुंबू नये आणि दळणवळण विस्कळीत होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते, अशा भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार तत्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे.
पूरस्थितीला सामोरे जाण्यास प्रशासन सक्षम
अतिवृष्टी किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा, यासाठी आवश्यक नियोजन तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सज्ज असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
कृष्णा नदीतील प्रदूषणाबाबत स्पष्ट भूमिका
सध्या कृष्णा नदीच्या पाण्यात प्रदूषणासदृश स्थिती निर्माण झाल्याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी त्याचा कराड शहराच्या पाणीपुरवठ्याशी कोणताही संबंध नसल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी स्पष्ट केले. यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अपुऱ्या माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पिण्याचा पाणीपुरवठा कोयना नदीतूनच
कराड शहराला पिण्याचा पाणीपुरवठा हा कोयना नदीतून केला जात असल्याने कृष्णा नदीतील सध्याच्या स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम होत नाही. नागरिकांना नियमितपणे स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा केला जात असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षितते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं स्पष्ट नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उल्लेख केला
Comments
Post a Comment