कराड दक्षिणेतील रखडलेल्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न विधान सभेत; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला सरकारचे सकारात्मक आश्वासन
कराड, दि. २ : विद्या मोरे
● पाणंद रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत :
कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत प्रभावीपणे मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले. अपूर्ण राहिलेली कामे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता दुरुस्ती योजना अंतर्गत समाविष्ट करून ती लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली.
● २२७ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी, मात्र अनेक कामे अपूर्ण :
आ. डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील तब्बल २२७ किलोमीटर पाणंद रस्त्यांना 'मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजना' अंतर्गत मंजुरी मिळाली होती. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार होता. मात्र मंजुरीनंतरही अनेक रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना आजही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
● केवळ ५१ रस्त्यांचीच कामे पूर्ण :
सभागृहात बोलताना आ. डॉ. भोसले यांनी सांगितले की, १० जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी मिळालेल्या २२७ किलोमीटर पाणंद रस्त्यांपैकी जवळपास दोन वर्षांनंतरही केवळ ५१ रस्त्यांचीच कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे तसेच कृषी मालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही कामे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेत समाविष्ट करून पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
● सरकारकडून सकारात्मक आश्वासन :
यावर उत्तर देताना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले की, संबंधित योजना महसूल विभागाशी निगडित असून काही कामे रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्यात आली आहेत. या विषयावर महसूल विभाग व रोजगार हमी विभागाची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल. तसेच अपूर्ण राहिलेल्या पाणंद रस्त्यांचा मुख्यमंत्री बळीराजा योजनेत समावेश करून उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
● शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा :
ग्रामीण भागातील शेती, दळणवळण आणि विकासासाठी महत्त्वाचा असलेला पाणंद रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडल्यामुळे शासनस्तरावर हालचालींना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील रखडलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांना गती मिळून शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment