कृषी दिनी रोटरी क्लब ऑफ कराडचा सुर्लीत हरित संकल् पवृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन व सेंद्रिय शेतीचा जागर
▪️ कराड, दि. ५ : विद्या मोरे; रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने रोटरी वर्षाच्या प्रारंभाचा पहिला दिवस कृषी दिनाचे औचित्य साधत सुर्ली येथील माध्यमिक विद्यामंदिरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
▪️ कार्यक्रमाची सुरुवात : मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. "झाड लावा, झाड जगवा" हा संदेश देत विद्यार्थ्यांनीही वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.
▪️ मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो. चंद्रशेखर पाटील, सचिव रो. सुनील चाळके, पर्यावरण जागृती विभागाचे संचालक आनंदा थोरात, संचालक शिवराज माने, रघुनाथ डुबल, राजगोंडा अपिने, मुख्याध्यापिका सौ. विजया कदम तसेच अनिल जाधव उपस्थित होते.
▪️ रोटरीच्या उपक्रमांची माहिती : अध्यक्ष रो. चंद्रशेखर पाटील यांनी रोटरी क्लबतर्फे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक विकास आणि जनकल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
▪️ पर्यावरण संवर्धनाचा संदेश : पर्यावरण जागृती विभागाचे संचालक आनंदा थोरात यांनी वाढते प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर भाष्य केले. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
▪️ सेंद्रिय शेतीवर भर : सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून प्रत्येक कुटुंबाने सेंद्रिय परसबाग विकसित करून विषमुक्त अन्ननिर्मितीकडे वाटचाल करावी, असे मत आनंदा थोरात यांनी व्यक्त केले.
▪️ विद्यार्थ्यांना प्रेरणा : शिवराज माने यांनी वृक्षलागवड ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून वृक्षांचे संवर्धन ही प्रत्येकाची आयुष्यभराची जबाबदारी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
▪️ मोठा प्रतिसाद : कार्यक्रमास सहशिक्षिका सौ. मीना मगरे, सौ. आरती वेताळ, सौ. शिकलगार, सुनील धोत्रे, रमेश धोत्रे, यशवंत वेताळ, गोल्डन ग्रुप सुर्लीचे सदस्य, कृष्णात वेताळ, गावातील युवक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️ जनजागृतीचा उपक्रम : या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.
Comments
Post a Comment