लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति दिनानिमित्त कराडमध्ये 'समता पर्व'; मानवतावादी विचारांचा जागर करणारे ज्येष्ठ कवी नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान
कराड | विद्या मोरे
समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि सर्वधर्म समभावाचा संदेश जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने समता सामाजिक विकास संस्था, कराड यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'समता पर्व' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, साहित्यिक, प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय विचारवंत मा. श्री. नितीन चंदनशिवे यांचे "मानवतावादी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाचा दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात त्यांच्या साहित्याचे सामाजिक भान, वंचितांच्या न्यायासाठीचा संघर्ष, परिवर्तनवादी विचार आणि आधुनिक काळातील त्यांचे महत्त्व यांचा सखोल उहापोह केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भीम शक्ती सातारा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री. आनंदराव लादे यांनी केले असून, पारधी मुक्ती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष श्री. प्रकाश वायदंडे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाजात समतेची मूल्ये रुजविणाऱ्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी साहित्यप्रेमी, विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment