प्रा. सौ. जयमाला साठे यांची अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; महिला नेतृत्वाला ऐतिहासिक संधी
कराड : विद्या मोरे | दि. २५ ऑगस्ट २०२६
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या वारशाचा जागर करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्या अध्यक्षपदी प्रा. सौ. जयमाला अमोल साठे (रा. म्हासोली, ता. कराड) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे समितीच्या कार्याला नवे नेतृत्व लाभले असून सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलेला मिळालेल्या या संधीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कराड येथे पत्रकार तथा समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकमताने प्रा. जयमाला साठे यांच्या नावाला अनुमोदन देत अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली.
बैठकीस समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, माजी अध्यक्ष दत्तात्रय भिसे (फौजी), रामभाऊ दाभाडे, रमेश सातपुते, गजानन सकट, आकाराम चव्हाण, श्रीकांत सातपुते, संतोष चव्हाण, राहुल वायदंडे, सुरज घोलप, अरुण कमाने, देवानंद कांबळे, परशुराम साठे, ॲड. राधा भोसले, जयवंत सकटे, अमित वायदंडे, दिलीप चव्हाण (आप्पा), सोमनाथ महापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
समितीचे सचिव हरी बल्लाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक करून समितीच्या आगामी उपक्रमांची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे आभार कु. जाई प्रकाश यांनी मानले.
प्रा. सौ. जयमाला साठे या उच्चशिक्षित असून सामाजिक कार्याबरोबरच मर्दानी खेळ, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत आहेत. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रथमच अशा अभ्यासू, सामाजिक जाण असलेल्या आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित महिलेची निवड झाल्याने हा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीचे सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment